भाजपच्या शक्तिकेंद्रांना दिल्लीची रसद!

Foto

औरंगाबाद- हिंदुत्ववादी प्रतिमेच्या बळावर अटीतटीच्या लढतीत जिंकता येणार्‍या जागांवर भाजप धुरीनांनी लक्ष केंद्रित केले आहे. देशभरातील पंचवीस ते तीस लोकसभा मतदार संघ विरोधी पक्षाकडून अथवा मित्रपक्षाकडून हिसकावून घेण्याची तयारी पक्षाने चालविली आहे. जिल्ह्यातील शक्ती केंद्रांना थेट दिल्लीचाच डोस मिळणार असल्याचे समजते.

 

औरंगाबाद मतदारसंघही अजेंड्यावर आहे. या मतदारसंघावर थेट अमित शहा लक्ष ठेवून आहेत. राज्यातील निवडक जागेचा तिढा न सुटल्यास शिवसेनेसोबत दोन हात करून पटक देण्याची भाषा शहांनी केली अन युतीत मिठाचा खडा पडल्याचे बोलले जाते. शिवसेनेकडून पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केल्याने भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. पंढरपुरात ठाकरे यांनी चक्क राहुल गांधीच भाषा वापरली, याचा राग सध्या भाजपात धुमसतो आहे.

 

शिवसेनेला अस्मान दाखवायचे असा चंगच भाजपमधील काही नेत्यांनी बांधला असून तशी तयारीही सुरू केली आहे. शहरात दोन दिवसांपासून ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे ठाण मांडून आहेत. त्यांनी शहरासह तालुका प्रमुख शक्ती केंद्र कार्यकर्त्यांची बैठक घेतली. केंद्रीय नेतृत्वाचा आदेश कार्यकर्त्यांना समजून सांगितला गेला.  

 

कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक मतदाराला भाजपकडे आकर्षित करण्याचा सल्ला दिला. गेल्या दोन आठवड्यांपासून भाजपातील घडामोडी लक्षात घेता औरंगाबादेत पक्ष उमेदवार देईल याची खात्री पटते. इच्छुक उमेदवारांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी कानमंत्र दिल्याचे बोलले जाते. 

आज ग्रामीण कार्यकर्त्यांसोबत संवाद 

 

दरम्यान मंत्री पंकजा मुंडे आज ग्रामीण भागातील बुथ प्रमुख तसेच प्रमुखांसोबत संवाद साधणार आहेत. प्रसिद्धीमाध्यमांना दूर ठेवत भाजपने या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. आज दिवसभर चालणार्‍या या कार्यक्रमातून एकला चलो रे संदेश दिला जाणार यात शंका नाही.